नांदेड : नांदेड जिल्ह्यात सरलेल्या सप्ताहअखेरपर्यंत खरीप क्षेत्रांपैकी ३३.५० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. मे महिन्यामध्ये झालेला मान्सूनपूर्व पाऊस आणि तज्ज्ञांचा अंदाज यावर विसंबून बळीराजाने पेरणीची गडबड केली; परंतु आता पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने पेरलेल्या बियाणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. उलट कडक उन्हामुळे उकाडा प्रचंड आहे. जे शेतकरी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत, तेच सध्या काहीसे चिंतातूर आहेत.
धूळपेरणी हा एक पारंपरिक प्रकार आहे. दरवर्षीच नियमित व दमदार पावसाला सुरुवात होण्यापूर्वी २५ टक्के पेरणी पूर्ण झालेली असते. परिणामी दुबार पेरणी हा सुद्धा नित्याचा प्रकार होऊन बसला आहे. यंदाचे वर्ष सुद्धा त्याला अपवाद राहिलेले नाही.
यंदा मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला; परंतु त्यामुळे जमिनीतील उष्णता नष्ट झालेली नव्हती. शिवाय यावर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत होते. त्यामुळे जून महिन्याच्या २० तारखेपर्यंत ३३.५० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. नांदेड जिल्ह्यात एकूण पेरणीयोग्य क्षेत्र ७ लाख ६१ हजार ५७४ हेक्टर आहे. पैकी २ लाख ५५ हजार १६४ हेक्टर खरीप हंगामात पेरणी झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात तृणधान्यांपैकी तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिके घेतली जातात. तर तूर, मूग, उडीद व इतर असे कडधान्याचे प्रकार पेरले जातात. उन्हाळी भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल व सोयाबीन या तेलबियांचे पीक सुद्धा घेतले जाते. सोयाबीन वगळता अन्य गळीत धान्याचे क्षेत्र शेकड्यामध्ये आहे; परंतु सर्वाधिक १ लाख ३७ हजार २७० हेक्टरवर सोयाबीन पेरले गेले. त्यानुसार ३२.८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
तृण धान्यापैकी तांदळाची पेरणी (६७ हेक्टर) ७.४६ टक्के झाली. ज्वारी (३१४७ हे.) १३.३ टक्के, बाजरी (१८ हे.) ५०, मका (४६३ हे.) ५३.३४ तर केवळ ७ हेक्टरवर अन्य तृणधान्य पेरले गेले. त्यानुसार २५ टक्के पेरणी झाली आहे. कडधान्यांपैकी तुरीचे खरीप क्षेत्र २० हजार २८८ हेक्टर असून, २८.८९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मूग (४६९५ हे.) २१.२, उडीद (३८५८ हे.) १७.१५ तर इतर कडधान्य १३.४६ टक्के पेरले गेले आहे.
तेलबियांना गळीत धान्य म्हणून ओळखले जाते. पैकी सोयाबीनचे एकूण क्षेत्र ४ लाख १८ हजार ४२ हेक्टर आहे. पैकी खरीप हंगामात १ लाख ३७ हजार २७० हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी ३२.८४ टक्के भरते. तीळ (९८ हे.) २५ टक्के, कारळ (६८ हे.) ३०.६३ टक्के पेरणी झाली आहे. उन्हाळी भुईमूग आणि सूर्यफूल ही पिके खरीपात घेतली जात नाहीत. तर इतर गळीत धान्याचे क्षेत्र ५३ हेक्टर असून, ९३ टक्के पेरणी झाली आहे.
कापसाची पेरणी ४३ टक्के पूर्ण
तुलनेने कमी पाण्याचे पीक म्हणून उंच भागातील शेतकरी कापसाला पसंती देतात. नांदेड जिल्ह्यात कापसाचे एकूण क्षेत्र २ लाख १ हजार ४७१ हेक्टर आहे. पैकी ८५ हजार १११ हेक्टरवर कापसाची पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी ४२.२५ आहे. एकूण ७ लाख ६१ हजार ५७४ हेक्टर पैकी २ लाख ५५ हजार १६४ हेक्टरवर अर्थात ३३.५० टक्के पेरणी झाली आहे. पण, पाऊस तर गायब आहे. शिवाय कडक ऊन पडल्याने उकाडा जबरदस्त असून, पेरलेले बियाणे करपण्याची भीती निर्माण झाली आहे.