केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, खळबळजनक विधान केल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे भर पत्रकारपरिषदेत राणेंकडून असं विधान करण्यात आल्याने, सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं आहे. रायगडमधील महाड येथे आज केंद्रीयमंत्री राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंकडून असं खळबळजनक विधान करण्यात आलं आहे. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.” असं राणे म्हणाले आहेत. या पत्रकारपरिषदेस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे.” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

तसेच, तेल शुध्दीकरणाचा प्रकल्प कोकणातच व्हायला हवा असे मत केंद्रीय लघु सुक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केले. ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचा दावाही त्यांनी केला. पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे महामार्गाचे काम रखडले –

मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्ष रखडले आहे. ज्यांनी कामे घेतली त्यांनी ती पूर्ण केली नाहीत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदूर्ग जिल्ह्यासोबतच रस्त्याच्या कामाला सुरवात झाली. सिंधुदूर्गातील काम पूर्ण झाले. पण इथे काम झाले नाही. त्याला ठेकेदार आणि ज्यांनी ठेका मिळवून दिला ते  जबाबदार आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांची भेट घेणार त्यांना सर्व ठेकेदारांची कामे काढून घेऊन नवीन ठेकेदार नेमावेत अशी विनंती करणार आहे. नवीन ठेकेदारांकडून सात ते आठ महिन्यात रस्ते पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न करीन अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मला रिफायनरी कोकणातच व्हायला हवी –

मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एका रिफायनरीमुळे कोकणात दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. एक नवीन शहर विकसीत होणार आहे. या प्रकल्पाबरोबरच शाळा, रुग्णालय, कॉलेजही येणार आहे. यामुळे येथील विकासाला गती मिळणार आहे.

पूरग्रस्त भागासाठी उपाययोजना करणार –

महाड शहराला १९२३ पासून सातत्याने पूर येत आहेत. ही समस्या आजची नाही. पूर का येतो याचा अभ्यास करणार, त्यामागची कारण कोणती, कोणत्या उपाय योजना कराव्या याचा आढावा करणार, पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी केंद्र आणि राज्यसरकार संयुक्तपणे काम करेल. त्यासाठी लवकरच दिल्लीत एका बैठकीचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच, ज्यांचे पूरात नुकसान झाले त्यांना भेटलो. त्यांना कुठल्याही स्वरूपाची मदत मिळालेली नाही. मी येण्यापूर्वी कृषी मंत्र्यांना भेटलो होतो. त्यांनी ७०० कोटी राज्यसरकारला दिल्याचे सांगीतले. पण ते राज्यसरकारने अद्याप वाटले नाहीत. केंद्रानी पाठवलेली मदत पोहोचत नाही. संकटकाळी सरकारने पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे रहायला हवे. राज्यसरकारने ते अद्याप केलेले नाही. पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री सितारामन यांना भेटून पूरग्रस्तांसाठी केद्राची अधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगीतले. पूरामुळे महाड मध्ये एमआयडीसीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल मी मागविला आहे. तो आल्यानंतर एमआयडीसीला काय मदत करता येईल हे ठरवू असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan ranes sensational statement while criticizing cm msr
First published on: 23-08-2021 at 21:48 IST