राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्थानिक पातळीवर होणाऱ्या राजकारणावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायण गाव बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक राजकीय चर्चांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लॉकडाउनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळतंय. वयस्कर नेत्यांनं असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं.’ असं बोचरी टीका त्यांनी यावेळी केली. “माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे ही गोष्ट विसरू नये. महाराष्ट्राचा सरकार हे राज्याच्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला कुणी नख लावण्याचा प्रयत्न करू नये”, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मांडलं.

“जर चोरांचं राज्य असेल. काही लोकं म्हणतात सगळे चोर एकत्र झाले. दुर्दैवाने या चोराकडे बीएमडब्ल्यू नाही. चोराला सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी शूटींग करावी लागते. तेव्हा त्याच्या घरची चूल पेटते. ज्यांच्याकडे बीएमडब्ल्यू ते चोर की ज्यांना कामधंदा करावा लागतो ते चोर, आता त्यांनी ठरवावं” अशी अप्रत्यक्ष टीकाही अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर केली.

पंतप्रधान मोदी – शरद पवार यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पराभव केला. कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना खासदारकीसाठी तिकीट जाहीर झाले. अगदी प्रचाराच्या दिवसांपासून अमोल कोल्हे यांनी आढळरावांना कडवं आव्हान दिलं होतं. शिरुर मतदारसंघातील एकूण १२ लाख ८६ हजार २२६ मतांपैकी अमोल कोल्हे यांना ४९.१७ टक्के मते मिळाली. २३ उमेदवार उभे असणाऱ्या या मतदारसंघातील जवळजवळ ५० टक्के म्हणजेच ६ लाख ३२ हजार ४४२ मते मिळाली. कोल्हे यांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या अढळराव पाटील यांना ४४.६४ टक्के म्हणजेच ५ लाख ७४ हजार १६४ मते मिळाली. कोल्हे यांनी ५८ हजार २७८ मतांनी अढळराव यांचा पराभव केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp amol kolhe on shivsena and cm uddhav thackeray rmt
First published on: 17-07-2021 at 20:25 IST