काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज याने दहावीच्या परीक्षेत (ICSE) ९८.३३% गुण मिळवले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खुप आनंद झाला असता अशी भावनाही व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळेंनी काय लिहिलं आहे फेसबुक पोस्टमध्ये "राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खुप आनंद झाला असता. राजीव आणि प्रज्ञा यांचा मुलगा पुष्कराज याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (ICSE) ९८.३३% गुण मिळविले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. पुष्कराज, खुप मोठा हो ! आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो", असं सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. राजीव सातव यांचं १६ मे रोजी निधन काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय राजकारणातील पक्षाचे अभ्यासू नेते राजीव सातव यांचे १६ मे रोजी पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात निधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. सातव यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूचेही त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष होते. मात्र, २३ दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली होती. राजीव सातव यांची कारकिर्द कळमनुरी तालुक्यातील मसोड पंचायत समिती गणातून २००२ मध्ये निवडून आलेल्या सातव यांचा युवक काँग्रेसच्या बांधणीच्या निमित्ताने दिल्ली येथे वावर वाढत गेला. संघटनात्मक बांधणीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमवेत असणारा नेता अशी सातव यांची ओळख होती. माजी मंत्री रजनी सातव यांच्याकडून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य अशी एकेक पायरी चढत राजीव सातव खासदार झाले. २००७ मध्ये खरवड गटातून निवडून आल्यानंतर त्यांनी कृषी सभापतिपद सांभाळले होते. शेतीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्कार देण्यास त्यांनी सुरुवात केली. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून ते २००९ मध्ये निवडून आले. त्यांच्या प्रयत्नातून कळमनुरी येथे सशस्त्र सीमा दल, औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याच्या कामात पुढाकार घेतला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात हिंगोलीसारख्या मागास भागात लिगो इंडियाचा गुरुत्वीय लहरींबाबत संशोधनाचा प्रकल्प हाती घ्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २०१४ मध्ये मोदी लाटतेही ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध विषयांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी पक्षाचे धोरण ठरविण्याच्या कामात मोठे योगदान दिले. त्यानंतर लोकसभा निवडणूक न लढवता पक्षवाढीसाठी त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये प्रभारी म्हणूनही नेमण्यात आले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच काँग्रेस नेतृत्वाने २०२० मध्ये त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड केली होती.