भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे प्रचाराला जात असताना बीड जिल्ह्यातील केजमध्ये त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्च करत आंदोलकांना पांगविण्याच प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी गोंधळ उडाला. यानंतर माध्यमांशी बोलताना झालेल्या प्रकाराबद्दल पंकजा मुंडे यांनी सविस्तर माहिती सांगितली. तसेच गाडी अडवत गोंधळ घालणारे हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला. याबरोबरच बीड जिल्ह्यासाठी आपल्याकडे व्हिजन असून आपण दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकच हट्ट करणार असून दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. पंकजा मुंडे नेमके काय म्हणाल्या? "माझ्या गाडीच्या भोवती माझे कार्यकर्ते असल्यामुळे नेमके काय झाले मला जास्त कळले नाही. मात्र, मी जात असताना दोन-तीन युवकांच्या हतात काळे झेंडे होते. असा प्रकार याआधीही एकदा घडला होता. तेव्हा मी पोलीस अधीक्षकांना सांगितले होते, कोणावरही गुन्हे दाखल करू नका. आजही असा प्रकार घडला. काही जणांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये तीन-चार लोक होती, ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील असतील. मात्र, जे दुसरे लोक होती, ते राजकीय लोक होते. ज्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, ती लोक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधील नव्हती. तर ती लोक राजकीय असल्याचे दिसते", असे पंकजा मुंडे म्हणाल्या. हेही वाचा : भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी, मोदी, शाह, फडणवीस यांच्यासह ४० नावं "मी जनतेला वेगळे काही आवाहन करणार नाही. जे लोक संयमी आहेत. त्या लोकांना या गोष्टी पाहायला आवडत नाहीत. मला वाटत नाही की गोंधळ घालणारे ते आंदोलक होते. कारण मराठा आंदोलन चालू असताना मी परिक्रमा यात्रा काढली होती. तेव्हा कुठेही मला अडविण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यानंतर बीड जिल्ह्यातही मी फिरते. त्या ठिकाणीदेखील मला अडचण आली नाही. मात्र, केजमध्ये गोंधळ घालण्याचा हा प्रकार राजकीय असल्याचे वाटते", असे पंकजा मुंडे म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांच्याकडे काय हट्ट करणार? "माझ्याकडे बीड जिल्ह्यासाठी व्हिजन आहे. माझ्या बीड जिल्ह्याचा चेहरा गेल्या पाच वर्षात बदलला आहे, तो चेहरा आज बघण्यासारखा आहे. आता पुढे काय करायचे? याचे व्हिजन माझ्याकडे आहे. मी बीड जिल्ह्याचा चेहरा पाच वर्षात जो बदलला, तो आणखी देखणा कसा करता येईल? हे स्वप्न पाहते आहे. संसदेत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकच हट्ट करून बीड जिल्ह्यासाठी दहा हजार तरुणांना रोजगार कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे", असे पंकजा मुंडे म्हणाल्या.