भाजपा नेत्या पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कधी विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने, तर कधी राज्यातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या नाराजीबाबत तर्कवितर्क लावले गेले. ते सर्व अंदाज भाजपा नेत्यांनी फेटाळले. अशातच आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. “मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाही,” असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीही वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते मला संपवू शकत नाही.”

“राजकारण करमणुकीचं साधन व्हायला लागलं आहे”

“आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे. त्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याचं मशीन नाही की, पैसे छापा आणि राजकारणावर खर्च करा. सध्या राजकारण करमणुकीचं साधन व्हायला लागलं आहे. गणेशमंडळ करा, नवरात्री, दांडीया करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा. अरे काय चाललं आहे हे? हे आमचं काम नाही,” असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “पंकजा मुंडे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून…” प्रीतम मुंडेंचं विधान चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझं काम संस्कृती जपणं आहे हे मान्य, मात्र…”

“जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांना हे अपेक्षित नाही. माझं काम संस्कृती जपणं आहे हे मान्य आहे. मात्र, माझं काम देशाला काही तरी देणंही आहे. असाच प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असं मला वाटतं,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.