पुण्यात पोर्श या महागड्या गाडीखाली दोन तरुणांचा हकनाक बळी गेला आहे. अल्पवयीन चालक परवाना नसताना बेदरकारपणे गाडी चालवत होता. जवळपास १५० किमी वेगाने या गाडीने एका दुचाकीला उडवले. या दुचाकीवर एक जोडपं होत. या जोडप्यापैकी तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर, तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्ररकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत एक्सवरून पोस्ट केली आहे.

१९ मेच्या पहाटे अडीचच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने एका मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी त्याची रवानगी कोठडीत करण्यात यावी अशी मागणी केली. तसंच आरोपी साडेसतरा वर्षांचा आहे, त्यामुळे त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा, अशी मागणीही करण्यात आली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली तसेच या आरोपीला जामीन मंजूर केला. ३०० शब्दांचा निबंध लिहून देणे, आरटीओला सहकार्य करणं, अपघातग्रस्तांना मदत करणे आदी अटींवरून त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याने महाराष्ट्रभर संताप व्यक्त करण्यात आला. एखाद्या अपघतात दोघांचा मृत्यू झाला आणि त्याला जामिनावर सोडवण्याकरता फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा देणं म्हणजे कायद्याचा अपमान असल्याचा सूर जनसामान्यातून उमटू लागला. आता यावर अमृता फडणवीस सुद्धा व्यक्त झाल्या आहेत.

हेही वाचा >> पुणे अपघातप्रकरणातील आरोपीच्या आजोबांचा थेट छोटा राजनशी संबंध? शिवसेना नेत्याने सांगितला २००९ सालातील ‘तो’ प्रसंग

“अनिश अवाधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. आरोपी वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झाली पाहिजे. बालन्याय मंडळाचा निषेध”, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

वडिलांनीच मोटार दिली…

कल्याणीनगर भागात अपघात प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाची चौकशी करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा मी मद्याप्राशन करतो, याची माहिती वडिलांना होती. वडिलांनी मला मोटार दिल्याची कबुली त्याने न्यायालयात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >> पुण्यातील अपघात प्रकरणी चौघे अटकेत; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांना बेड्या

बालन्याय मंडळाच्या निकालावर फडणवीसांची नाराजी

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचे पडसाद उमटू लागल्यावर राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीने पुण्यात येऊन पोलिसांकडून आढावा घेतला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने केल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी तपास अहवाल सादर केल्यानंतरही आरोपी मुलाला जामीन देण्याचा बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पबमध्ये होणारे गैरप्रकार लक्षात घेता यापुढे परवानगी देण्याचे धोरण बदलले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.