राहाता : उंबरी बाळापूर येथे आज शुक्रवारी पहाटे बिबट्याने पशुधनावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, सात ते आठ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच बिबट्याने या ठिकाणी असलेल्या १५ ते २० कोंबड्यांचा देखील फडशा पाडल्यामुळे शेतकऱ्यांचे काही लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उंबरी बाळापूर शिवारातील लेंडी पुलाजवळ असलेल्या दत्तनगर येथे खंडू कारभारी होडगर यांची गट नंबर ४७६ मध्ये शेती आणि मेंढ्या व कोंबड्यांसाठी बांधलेले शेड (गोठा) आहे. यामध्ये ४५ मेंढ्या आणि २५ ते ३० गावरान कोंबड्या होत्या. गुरुवारी कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्यामुळे संदीप होडगर हा नेहमीप्रमाणे गोठ्यात झोपण्यासाठी जाऊ शकला नाही. शुक्रवारी सकाळी संदीप गोठ्यात मेंढ्यांना चारापाणी करण्यासाठी गेला असता, त्या ठिकाणी चार ते पाच मेंढ्या रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेल्या दिसल्या, लहान कोकराचादेखील समावेश आहे. तर, सात ते आठ मेंढ्या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.
त्यामुळे संदीपने या दुर्दैवी घटनेची माहिती कुटुंबातील इतर सदस्यांना कळवल्यानंतर सुरेश होडगर यांनी तत्काळ वन विभागाला याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपाल रमेश पवार, वनरक्षक एस. बी. सोनवणे, वनमजूर बाळासाहेब डेंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या मृत मेंढ्यांचा कागदोपत्री पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
नऊ ते दहा महिन्यांपूर्वी संदीप होडगर या तरुणाने कर्ज काढून या मेंढ्या खरेदी केल्या होत्या. ही घटना घडल्यामुळे त्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून वन विभागाने जास्तीत जास्त भरपाई या तरुणाला द्यावी, अशी मागणीदेखील उपस्थित शेतकऱ्यानी या प्रसंगी केली. या वेळी रासपचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र खेमनर (जानकर), संदीप होडगर, सुरेश होडगर, लक्ष्मण जुधारें, बापू कुदनर, राहुल जुधारें, नानासाहेब होडगर, रवींद्र खेमनर, सोमनाथ शिंदे यांनी परिसरात बिबट्यासह रानडुकराचीदेखील दहशत असल्याची माहिती दिली. तसेच या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावून हा बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी केली.