अलिबाग: सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी १६० मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. पनवेल, मुरुड, अलिबाग, म्हसळा तालुक्यात २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. आजही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सून कोकण किनारपट्टीवर सक्रिय झाला आहे. दहा दिवस आधीच आलेल्या पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १४० मिमी पावसाची नोंद झाली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १६० मिमी पावासाची नोंद झाली आहे. म्हणजेच दोन दिवसात तब्बल ३०० मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात नोंदवला गेला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने कुंडलिका, सावित्री, आंबा, पाताळगंगा, उल्हास नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना तसेच डोंगर उतारावरील गावांना जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंद म्हसळा येथे झाली. इथे २८२ मिमी पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल मुरुड येथे २५० मिमी, पनवेल २४५ मिमी, अलिबाग २४१ मिमी, तळा १७४ मिमी, श्रीवर्धन १७० मिमी, पेण १६० मिमी, माथेरान १५२ मिमी, माणगाव १३६ मिमी, रोहा १३२ मिमी, खालापूर १२३ मिमी, पोलादपूर ११८ मिमी, कर्जत १०३, सुधागड १०२, उरण १००, महाड ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाडचा अपवाद सोडला तर उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये शंभर मिलीमीटरहून अधीकचा पाऊस नोंदवला गेला आहे. अतिवृष्टीमुळे १३ कच्च्या तर २२९ पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे.
कर्जत तालुक्यातील बिरदोले गावात रोशन कालेकर या ३० वर्षीय शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. शेतात काम करत असतांना अंगावर वीज पडल्याने तो जागीच दगावला आहे. जिल्ह्यात वीज पुरवठा खंडीत होणे, वक्ष उन्मळून पडणे, सखल भागात पाणी साचणे, रस्ता खचणे, दरडी कोसळणे यासारख्या घटनांची नोंद झाली आहे. दरम्यान येत्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.