मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत मनसेच्या पाडवा मेळाव्यात घेतलेल्या भूमिकेमुळे त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते. मशीदींवरील भोंगे उतरले नाहीत, तर त्यासमोर दुप्पट आवाजात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. यावरून राजकारण तापलेलं असतानाच आता राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. हा दौरा तूर्त स्थगित केल्यानंतर आज राज ठाकरेंची पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे जाहीर सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर चौफेर निशाणा साधला. अयोध्या दौऱ्यावरून आव्हान देणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा देखील त्यांनी समाचार घेतला.

“..म्हणून अयोध्या दौरा स्थगित केला”

अयोध्या दौरा स्थगित करण्यामागचं कारण यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं. “ज्या प्रकारचा माहौल अयोध्येत उभा केला जात होता…मी उद्या जर तिथे जायचं ठरवलंच असतं, तर महाराष्ट्रातून अनेक बांधव तिथे आले असते. तिथे जर काही झालं असतं, तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि हकनाक काही कारण नसताना तो ससेमिरा तुमच्या पाठिशी लावला असता. म्हटलं मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देखील केसेस टाकल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळी इथे कुणीच नसतं. हा सगळा सापळा होता”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“..म्हणून म्हटलं आपणच सांगितलेलं बरं!”

दरम्यान, १ जून रोजी आपल्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी स्टेजवरून बोलतानाच जाहीरपणे दिली. “येत्या १ तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही. म्हटलं आपणच सांगितलेलं बरं”, असं म्हणत राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात हशा पिकला.

“निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करा”, राज ठाकरेंचा सुरुवातीलाच शरद पवारांना टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन-चार आठवडे रिकव्हरीसाठी जाईल. त्यानंतर महिना-दोन महिन्यांनी पुन्हा तुमच्यासमोर येईन. तूर्तास हे आंदोलन चालू ठेवायचं आहे. त्यासाठीचं पत्र सर्व हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायचं आहे”, असं म्हणत राज ठाकरेंनी भोंग्यांचं आंदोलन सुरूच ठेवण्याचं आवाहन मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे.