Raj Thackeray-Uddhav Thackeray Victory Rally : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या हिंदीच्या विषयांवरून आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर अखेर सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला. त्यामुळे जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आज मुंबईत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू अनेक वर्षांनंतर एकत्र येणार असल्यामुळे याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आणि मनसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येत होता.
वरळीत झालेल्या या मेळाव्यात मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे देखील थिरकल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी ‘एकच वादा राजू दादा…’, हे गाणं लागताच मनसैनिकांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप
आज झालेल्या मेळाव्यात व्यासपीठावर फक्त दोन्ही ठाकरे बंधू होते. या मेळाव्यात राज ठाकरे यांचं आधी भाषण झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. मात्र, राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर ते जेव्हा व्यासपीठावर जाऊन बसले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या पाठीवर थाप मारली आणि त्यांचं कौतुक केलं. तसेच राज ठाकरे यांच्या कानात काहीतरी कुजबुज करताच राज ठाकरे हे देखील दिलखुलास हसल्याचं पाहायला मिळालं आहे.
उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची युती होणार का?
मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना (ठाकरे) युती होणार असल्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, “राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने त्याच्या भाषणात मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली. त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता वाटत नाही. वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाट अण्णाजीपंतांनी दूर केला. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं.