गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यामुळे या महायुतीच्या चर्चेला अजूनच खतपाणी मिळालं आहे. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे युती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी रायगडमधील एका गंभीर घटनेचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे.

नेमकं काय घडलंय?

शालिनी ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये झी २४ तासचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रायगडमध्ये घडलेल्या एका घटनेविषयी वृत्त देण्यात आलं आहे. रायगडच्या तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीने एका निवृत्त महिला ग्रंथपालाला शिल्लक राहिलेला पगार मागितल्याच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचं वृत्त व्हिडीओत देण्यात आलं आहे. अस्मिता बोरावकर असं या महिला नगराध्यक्षांचं नाव असून प्रत्यक्ष मारहाणीचाही व्हिडीओ दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकारावरून शालिनी ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सवाल केला आहे. “मनसेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केली तर महिला आयोग स्वत:हून पुढाकार घेत पोलीस अहवाल मागवते. मग आज त्याच आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने महिलेला अमानुष मारहाण केली, तर आता गप्प का?” असा सवाल त्यांनी रुपाली चाकणकर यांना केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सगळ्या प्रकारावर ट्वीटमध्ये शेवटी त्यांनी “दुसऱ्याचं ते कार्ट आणि आपला तो बाब्या हा न्याय बरा नव्हे!” असं म्हणत खोचक टोलाही लगावला आहे.