सातारा : शहराची पाण्याची भूक भागविणारा कास तलाव सकाळी ओसंडून वाहू लागला. या वर्षी प्रथमच तो जून महिन्यातच पूर्ण भरला आहे. तलावामध्ये आता अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सातारकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा महादरे व हत्ती तलाव नुकताच भरला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आधी हत्ती तलाव आणि त्यानंतर त्याच्या प्रवाहामुळे महादरे तलावही ओसंडून वाहू लागला. यामुळे सातारकरांना पाणी पुरवणाऱ्या काससह महादरे व हत्ती दोन्ही तलाव भरले आहेत.

सातारा पालिकेने सुरू ठेवलेली पाणीकपात लवकरच मुख्याधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर मागे घेतली जाणार आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊन पश्चिम घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. सातारा जिल्ह्याला मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा दृश्य परिणाम जिल्ह्यातील पश्चिम भागात विशेषत: महाबळेश्वर, कास, बामनोली, पाटण, जावली या तालुक्यांत जोरदार पाऊस होऊन ओढे, नाले, नद्या खळखळून वाहू लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने सकाळीच भरला आणि येथील नव्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. कास तलावात आता तब्बल साठ फूट पाणीसाठा झाला आहे हे पाणी सातारकरांना वर्षभर पुरत असते. अर्धा टीएमसी पाणीसाठा असलेल्या कास तलावाचे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सातारा शहरासाठी तलावातून दररोज दहा लाख लिटर पाणी उचलले जाते. जून मध्येच यंदा पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने कास तलाव भरल्याने सातारकरांनी समाधान व्यक्त केले आहे.