येथील सावली तालुक्यातील हिरापूर येथे झालेल्या अपघातात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने तीन दुचाकीस्वारांना चिरडल्याने दोघे जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ८.३० वाजता घडली.
संतोष रूषी बावनवाडे (३३), गोपाळ बावनवाडे (२५), उद्धव यादव पिपरखेडे (५५), अशी मृतांची नावे आहेत.
हिरापूर येथे तिघे जण आपल्या दुचाकी (क्र. एमएच ३३ एम के ५७५९) ने सावली तालुक्यातील घोडेवाही येथे बैल खरेदी करण्याकरिता जात होते. हिरापूर येथील वळण रस्त्यावरून चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील सावलीकडे येत असतांना गडचिरोली येथे जाणाऱ्या भरधाव ट्रक (क्र.एम एच ३४ एम ८९१२) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, १०० मीटरपर्यंत दुचाकीसह त्यांना फरकटत नेले. त्यामुळे दोघे जागीच ठार झाले, तर उद्धव पिपरखेडे याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हे तिघे दुचाकीने वळत असतांना रस्त्याचा कडेला तीन ट्रक उभे होते त्यामुळे विरुद्ध दिशेने येणारा ट्रक त्यांना दिसला नाही म्हणून अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
या अपघातामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून ट्रक जाळण्याच्या तयारीत असतांना सावली पोलीस वेळीच दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून जमावाला पांगवण्यात आले. ट्रक मुल येथील गणेश खेवले यांच्या मालकीचा असून ट्रकचालक प्रफुल शेंडे (२३) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत. दरम्यान, आमदार विजय वड्डेटीवार यांनी घटनास्थळी येऊन मृतांच्या कुटुंबाना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले व कुटुंबाचे सांत्वन केले. मात्र, पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त करून रस्त्यावर गतिरोधकाची व कुटुंबांना त्वरित आर्थिक मदतीची मागणी केली.