राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे २०१९ साली विधानसभेच्या प्रचारातील पावसातील भाषण तुफान गाजलं होतं. त्यांच्या भाषणाची आजही राजकीय वर्तुळात चर्चा असते. दरम्यान, शरद पवार यांनी रविवारी (२६ नोव्हेंबर) नवी मुंबईत भर पावसात भाषण केलं. भर पावसात झालेल्या या भाषणावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी पवारांवर टीका केली. पावसात सभा घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले होते. आता सभा घेतल्यानंतर उरलेल्या दीड वर्षांत राष्ट्रवादी लोणच्याएवढी तरी राहील का. हा प्रश्न त्यांनी त्यांच्या मनाला विचारावा, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

आशिष शेलारांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार यांना अहंकार आला आहे. त्यांनी त्यांचा अहंकार दाखवत राहावं. आम्ही शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत राहू. आगामी निवडणुकीनंतर ते जेव्हा विरोधीपक्षात जातील, तेव्हा कोण लोणचं खाईल, ते आपण पाहुयात, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं. ते हिंगोली येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- VIDEO : “पावसात सभा घेतल्याने राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले होते, आता…”, शरद पवारांवर आशिष शेलारांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष शेलारांच्या विधानाबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “हा थोडासा अहंकार आहे. त्यांच्यात अहंकार येणारच कारण केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. २०१९ च्या निवडणुकीत कुणीतरी बोललं होतं, ‘मी पुन्हा येईन’. त्यांच्या बोलण्यातही तोच अहंकार होता. आता त्यांच्याच पक्षातला दुसरा नेता दुसऱ्या पद्धतीचा अहंकार दाखवत आहे. त्यांनी त्यांचा अहंकार दाखवत राहावं. आम्ही शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना विश्वासात घेऊन प्रयत्न करत राहू. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही लढू. ते सर्वजण विरोधीपक्षात जातील, तेव्हा लोणचं कोण खाईल ते आपण पाहुयात…”