Sadabhau Khot : महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. खरं तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीला सरकार स्थापन करण्यात तब्बल एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागला. त्यानंतर सरकार स्थापन झालं. आता अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार देखील बाकी आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.

तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीतील तिन्ही पक्षांना किती आणि कोणती कोणती मंत्रि‍पदे देण्यात येतात? हे देखील महत्वाचं ठरणार आहे. यातच काही मंत्रि‍पदावरून महायुतीतील पक्षात रस्सीखेंच सुरु असल्याची चर्चा आहे. आता यातच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे मोठी मागणी केली आहे. ‘मोठ्या पक्षांची मंत्रिपदं नंतर निश्चित करा, आधी छोट्या घटक पक्षांची मंत्रीपदं निश्चित करा’, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

हेही वाचा : गृहखातं देण्यास भाजपाचा नकार; शिवसेनेला ‘या’ खात्यांचा दिला पर्याय!

सदाभाऊ खोत काय म्हणाले?

“महायुती बरोबर आम्ही २०१४ पासून आहोत. आम्ही नक्कीच अनेक संकटांचा मुकाबला करत आलोत. आम्ही विस्तापितांचं नेतृत्व करतो. त्यामुळे माझीही इच्छा आहे की, लढणाऱ्या कार्यकर्त्याला संधी (मंत्रिपद) मिळावी. कारण विस्तापितांना लढायला बळ मिळेल. तसेच याचा विचार महायुतीने करावा, अशी अपेक्षा आम्ही करत आहोत. आम्ही प्रामाणिक काम केलं, आता पाहू ते काय निर्णय घेतात”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोत पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाचा खासदार आम्ही निवडून दिला. आता इकडे आम्ही भाजपाचे घटक पक्ष आहोत. त्यामुळे पैरा फेडला तर आनंद आहे. कारण विस्तापितांना कधीही संघर्षच असतो. माझा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता. माझा संघर्ष हा सर्वसामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी होता. आता मूठभर धान्य त्यांनी आमच्या सुपात टाकायचं की नाही? हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा आहे. माझं तर स्पष्ट मत आहे की, त्या तिघांनी आधी घटक पक्षांची मंत्रि‍पदे बाजूला काढावी, मग मंत्रि‍पदाचे वाटप करावं. मात्र, निवडणूक झाली की हे आम्हाला विसरून जातात”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.