हिंगोली : मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पानकन्हेरगाव येथे गुरुवारी शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीचे ‘गण गण गणात बोते’च्या गजरामध्ये आगमन झाले. यावेळी चार उत्खनकातून (जेसीबी) पुष्पवर्षाव करण्यात आला. पालखीच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. हिंगोली जिल्ह्यात तीन दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे.
यावेळी सेनगाव व गोरेगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तसेच आरोग्य विभागाचे पथक रुग्णवाहिकेसह सज्ज होते. सरपंच अर्चना देशमुख, शिवाजी देशमुख व भोजनाची व्यवस्था करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे गजानन महाराज पालखी सेवेकऱ्यांकडून संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी सेनगावकडे मार्गस्थ झाली. पालखी येथे रात्री मुक्कामी थांबते.
शुक्रवारी सकाळी संत नामदेव नरसी येथे आगमन झाल्यानंतर पालखीचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर डिग्रस कऱ्हाळे येथे मुक्कामी थांबते. शनिवारी पालखी औंढा नागनाथ मार्गे जवळा बाजार येथे मुक्कामी थांबेल. रविवारी दिंडी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. दरम्यान, पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागतासाठी भाविक व गावकरी सज्ज झाले आहेत.