संगमनेर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संपूर्ण राज्यात पाच वर्षांसाठी राबविले जाणार आहे. या अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा विविध स्तरांवर गौरव होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सहभाग घेऊन चांगले काम करून बक्षीस मिळवावे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. केंद्रात आणि राज्यात आपल्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळे निधीची अडचण येणार नाही; परंतु एकमेकांनी हातात हात घालून गावाचा विकास केला, तर गाव नक्कीच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असेही खताळ यांवेळी म्हणाले.

जिल्हा परिषदेचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि पंचायत समिती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, कृषी अधिकारी वाळीबा उघडे, बालविकास प्रकल्पाधिकारी नीलेश राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कुंडलिक येवले आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले, की ग्रामपंचायतीने राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतेच मर्यादित ठेवावे. निवडणुका संपल्या, की राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात घालून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. केंद्रात आणि राज्यात आपल्या विचाराचे सरकार आहे.

त्यामुळे निधीची अडचण येणार नाही; परंतु एकमेकांनी हातात हात घालून गावाचा विकास केला, तर गाव नक्कीच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीने गट-तट, मतभेद बाजूला ठेवून सहभागी होत बक्षीस मिळवून तालुक्याचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गटविकास अधिकारी सिनारे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र ठाकूर यांनी आभार मानले.

अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतीने फक्त बक्षीस मिळवण्याचा उद्देश ठेवू नये, तर या अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि खेडे कसे समृद्ध बनेल यासाठी काम करावे. सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपले गट-तट आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि पंचायत समिती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचे आयोजन केले होते.