सांगली : सर्वोदय साखर कारखाना सभासदांना परत देण्यासाठी आपण पैसे द्यायला तयार आहे, जयंतराव पाटलांनी सांगावे किती पैसे द्यावे लागतील असे आव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. रविवारी सायंकाळी सांगलीतील मारूती चौकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षाच्या काळातील विविध विकास कामांचे फलक अनावरण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देउन दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दिवंगत संभाजी पवार आणि व्यकप्पा पत्की यांनी वाळवा तालुक्यातील कांरदवाडी येथे सर्वोदय साखर कारखाना सुरू केला होता. पुढे हा कारखाना आर्थिक अडचणीत आला. या वेळी राजारामबापू कारखान्याने ही देणी देण्याची जबाबादारी घेत कारखाना ताब्यात घेतला. या पार्श्वभूमीवर तो पुन्हा ‘सर्वोदय’च्या सभासदांच्या हाती देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी वरील विधान केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना पालकमंत्री म्हणाले, की सर्वोदय कारखान्याचा जुना तिढा आहे. २०१४ ते २०१९ या सत्ताकाळात हा तिढा सोडवत आणला होता. कारखाना सभासदांच्या ताब्यात येण्याची वेळ आली होती. गाळप परवानाही मिळाला होता. मात्र याचवेळी महापूर आला. पुढे काही काळ सत्ता बदल झाला, या काळात कागदपत्रात फेरबदल झाल्याने हा विषय प्रलंबित राहिला. आता योग्य वेळी योग्य आणि न्याय बाबी होतील. जयंतरावांनी पैसे किती द्यायचे हे जाहीर करावे, आम्ही पैसे द्यायला तयार आहे असे सांगितले.