सांगली : सततच्या पावसामुळे शिराळा तालुक्यात भाताच्या धूळवाप पेरणीस फाटा मिळाला असून, यंदा मळक पद्धतीचा भात लावणीसाठी उपयोग केला जात असल्याचे कृषी पर्यवेक्षक गणेश क्षीरसागर यांनी सांगितले. पश्चिम भागात अतिपावसामुळे या पद्धतीचा वापर भात पेरणीसाठी केला जात आहे.
दरवर्षी मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर मशागतीची कामे आटोपून रोहिणी नक्षत्रामध्ये म्हणजेच मे अखेरीस धूळवापेवर भात पेरणी केली जाते. मात्र, यावर्षी बदलत्या हवामानामुळे पावसाने उसंतच दिली नाही. यामुळे मळक किंवा मळाक पद्धतीने लागवड केली जात आहे.
या पद्धतीमध्ये भाताचे बियाणे २४ तास पाण्यामध्ये भिजवले जाते. त्यानंतर २४ तास ओल्या गोणपाटात अंधारात झाकून ठेवले जाते. यानंतर मोड आलेले बियाणे पेरणीसाठी वापरले जाते. यासाठी पेरणी करावयाच्या क्षेत्रामध्ये पाणी बांधून चिखल केला जातो. चिखल स्थिर झाल्यावर मोड आलेले बियाणे हाताने फेकून चिखलावर पातळ विस्कटले जाते. आठवड्याभरात चांगले रुजून स्थिर होते व तीन ते चार पानावर येते.
मळक पद्धतीचा फायदा
या पद्धतीने भात लागवड करताना शेताची पूर्व मशागत, रोपवाटिका रोपे तयार करणे, मजुरी, तण नियंत्रण यावरील खर्च वाचतो, प्रतिकूल मुसळधार पावसात देखील लागवड शक्य होते. एक महिना पीक लवकर कापणीस येते. मात्र, चिखलावर फेकल्यानंतर किमान चार तास पाऊस पडला तर बी वाहून जाण्याचा धोका असतो.
शिराळा तालुक्यामध्ये शेकडो वर्षापासून या पद्धतीसाठी टाके भात हे स्थानिक वाण वापरले जाते. हे नावाप्रमाणेच ज्या ठिकाणी टाकले जाते त्या ठिकाणी रुजते. चिंचेवाडीमधील खरेश्वर बचत गटाने भात लागवडीसाठी पॅडी ड्रम सीडर तयार करून रहु पद्धतीने लागवड केली आहे, असे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.