भारताच्या इशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये जवळपास तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. परंतु, अनेकांना तिथल्या घटनांचं गांभीर्य नव्हतं. अशातच, चार दिवसांपूर्वी मणिपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तिथल्या कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांना ठार मारल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी संध्याकाळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर तिथल्या पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. लोकांच्या संतापानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली. परंतु त्यास तब्बल दोन महिने उशीर झाला. तसेच केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारने याप्रकरणी योग्य पावलं उचलली नाहीत, असाही आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरधील घटनेवरून थेट केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. खासदार राऊत म्हणाले, संपूर्ण देश आणि विश्वासमोर ‘मणिपूर फाईल्स’ ओपन झाल्या आहेत. लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ही केवळ एक घटना समोर आली आहे. परंतु तिथे अशा कित्येक घटना घडल्या आहेत.ब
हे ही वाचा >> “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”, आमदार अमोल मिटकरींचं ट्वीट चर्चेत
खासदार संजय राऊत म्हणाले, मणिपूरमध्ये भारतीय सैन्यावर हल्ले होत आहेत. परंतु तिथलं सरकार मूकदर्शक बनलं आहे. सरकार फक्त तमाशा बघत आहे. मणिपूरची अवस्था ही काश्मीरपेक्षा भयंकर झाली आहे. परंतु, भाजपाला ज्या प्रकारचं राजकारण काश्मीरमध्ये करता येतं ते तिथे करता येत नाही. भाजपा काश्मीरकडे लक्ष देते कारण, तिथे हिंदू-मुस्लीम राजकारण करता येतं. तिथे हिंदूस्थान-पाकिस्तान असं राजकारण करता येतं. परंतु असं राजकारण मणिपूरमध्ये करता येत नाही. मणिपूरमधील हिंसाचार आणि तिथल्या घटना भाजपाला राजकीय फायदा होऊ देत नाहीत, म्हणून भाजपावाले याप्रकरणी चूप बसलेत, शांत बसलेत.