कराड : पुणे- बंगळूरू महामार्गावर कराड, उंब्रज व रेठरे येथे ठेकेदाराच्या चुकीमुळे गेल्या पंधरवड्यातील अपघातांमध्ये चौघांचा बळी गेला आहे. वारंवार मागणी करूनही सुरक्षिततेचे उपाय होत नसल्याने ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने केली आहे.

जिल्हाध्यक्ष आनंद लादे, राजेंद्र कांबळे, संजय कांबळे व प्रशांत थोरवडे यांच्या शिष्टमंडळाने या संदर्भातील निवेदन आमदार डॉ. अतुल भोसले व तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले. या वेळी लादे म्हणाले, ‘महामार्ग सहा पदरीकरणाचे काम ठेकेदार अदानी यांच्या वतीने पोटठेकेदार डी. पी. जैन आणि अन्य कंपन्या काम करतात. ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबवल्या नसल्याने महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. महामार्गाच्या कामांमुळे वाहतूक वळवण्यात आली असली, तरी तसे फलक लावलेले नाहीत. सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे, चढ-उतार व चरी आहेत. त्यामुळेही अपघात होत आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी महामार्गाकडेला खोल खोदकाम केले आहे. पावसामुळे त्या ठिकाणी महामार्ग खचला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी लावलेल्या काँक्रीटच्या मोठ्या ब्लॉकला धडकून अपघात होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदाराने कामात सुधारणा केली नसल्याने अपघाताची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत रेठरेतील अपघातात दोन महिलांचा, तर कोल्हापूर नाका व उंब्रजमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही बाब केंद्रीय भूपृष्ठ विकासमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेऊन ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी लादे यांनी केली आहे.