कराड : सत्यजितसिंह पाटणकरांनी जनतेच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजपत प्रवेश केल्याने त्यांच्या मागण्यांना केंद्रीय व राज्याचे नेतृत्व न्याय देईल. भाजपत ज्या विश्वासाने ज्यांनी आज प्रवेश केला आहे, त्या सर्वांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नसल्याची ठाम ग्वाही भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. सामान्य जनतेसाठी सरकारच्या योजना राबविणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचा विश्वास चव्हाणांनी दिला.
खासदार शरद पवारांचे निकटचे सहकारी, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह आणि पाटणकर गटाचे तसेच काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मंगळवारी भाजपत जाहीर प्रवेश केला. त्या वेळी रवींद्र चव्हाण बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, सातारचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील, आमदार मनोज घोरपडे, केंद्रीय गौण खनिज मंडळाचे संचालक भरत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिवेंद्रराजे म्हणाले, सत्यजितसिंह पाटणकरांच्या निर्णयामुळे भाजपची ताकद निश्चितच वाढेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण व पक्ष नेत्यांशी चर्चा करूनच पाटणकरांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत.उदयनराजे म्हणाले, हा पक्ष प्रवेश खरंतर मागेच होणे अपेक्षित होते. आपण सर्वजण कुटुंब म्हणून काम करूयात, जिथे लागेल तिथे मी असणार आहे.डॉ. अतुल भोसले म्हणाले, सत्यजितसिंह भाजपत आल्याचा निश्चित फायदा होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व नक्कीच दिसेल.
निर्णय सर्वानुमते- सत्यजितसिंह
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, जनभावना लक्षात घेऊन भाजप प्रवेश केला असून, हा माझा एकट्याचा नव्हे, तर पाटण मतदारसंघातील कार्यकर्ते, मतदारांचा निर्णय आहे. गेले दहा वर्षे मुस्कटदाबीचे राजकारण झाले. विकासकामांना खिळ बसली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसमवेत भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ताकद दाखवून देऊ. भाजपची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही पाटणकर यांनी दिली.