सावंतवाडी: दक्षिण कोकणचे ‘प्रति महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीत यंदा लवकरच पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. हंगामपूर्व पावसामुळे आंबोलीतील हवामान आल्हाददायक बनले,आता धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी उच्चांक गाठला आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणेच यंदाही वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या गैरसोयीने पर्यटकांना हैराण केले आहे.
हवामानातील बदलांमुळे यंदा पाऊस लवकर सुरू झाला असला तरी, पावसाचा लहरीपणाही अनुभवायला मिळत आहे. तरीही, आंबोलीतील पाऊस, दाट धुके, मनमोहक धबधबे आणि हवेतील गारवा अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. येथील महादेवगड पॉईंटला नवीन लूक देण्यात आला असून, कावळेसाद पॉईंटचा गारवा पर्यटकांना आकर्षित करत आहे. तसेच, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्री आध्यात्मिक पर्यटकांची ओढ वाढत आहे.
आंबोली घाट रस्त्यावर धबधबे प्रवाहित झाल्याने वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सुट्टीच्या दिवशी पोलीस वाहतूक कोंडी आणि वाहन पार्किंग व्यवस्थेकडे लक्ष देत असले तरी, वाहन पार्किंग व्यवस्था दरवर्षी पावसाळ्यात चर्चेचा विषय ठरत आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देणारे सत्ताधारी अजूनही कायमस्वरूपी वाहन पार्किंगचे नियोजन करू शकले नाहीत, ही चिंतेची बाब आहे. वन विभागाच्या अखत्यारितील जमिनीवर वाहन पार्किंग व्यवस्था करता येत नसल्याने सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे. मात्र, मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आंबोलीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आंबोलीत हुज्जत तर सावंतवाडी मध्ये पोलिसांशी झटापट: गोवा राज्यातील तरुणांचा गोंधळ
मंगळवारी सायंकाळी आंबोली घाट रस्त्यावर गोवा राज्यातील काही तरुण पर्यटकांनी एका कारला बाजू देण्यावरून हुज्जत घातली. हा वाद सावंतवाडी शहरापर्यंत पोहोचला, जिथे एसटी बस स्थानकासमोर त्यांनी दुचाकी एका कारसमोर आडवी लावून पुन्हा वाद घातला. या प्रकरणानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला असता, या तरुणांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलिसांशी झटापट केली.
आंबोली येथे पर्यटनासाठी आलेल्या गोवा राज्यातील अंदाजे दहा ते बारा तरुण मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घाट रस्त्यावरुन जात असताना एका चारचाकी वाहनाला बाजू देण्यावरून त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. ही वाहने सावंतवाडी शहरात पोहोचल्यावर एसटी बस स्थानकासमोर या तरुणांनी पुन्हा गोंधळ घातला. त्यांनी आपली दुचाकी एका कारसमोर आडवी लावून पुन्हा वाद उकरून काढला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंबोली पर्यटनाची “झिंग” चढलेल्या या तरुणांनी पोलिस ठाण्याच्या आवरमध्ये पोलिसांशीही झटापट केली.