जवळपास दीड वर्षांनंतर आजपासून पुन्हा एकदा राज्यभरातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. दरम्यान, निश्चितच राज्यभरात शाळा सुरु झाल्याचा उत्साह असला तरीही आपल्यावरचं करोना महामारीचं संकट अद्यापही पूर्णपणे दूर झालेलं नाही. त्यामुळे, करोना प्रतिबंधक नियमांचं पालन आणि खबरदारी घेणं प्रथम कर्तव्य असणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा सर्वांचीच ही जबाबदारी असेल. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. “स्वयंशिस्त हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून शाळांनी स्वयंशिस्त पाळून आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी”, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.

‘मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक’

“शिक्षकांचं लसीकरण पूर्ण करूनच शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसा स्पष्ट नियम आहे. करोना प्रतिबंधक सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन झालंच पाहिजे. सर्व परवानग्या घेऊनच राज्यातील शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेनेदेखील यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करावं. खाजगी शाळांमध्ये पालक आणि शाळा व्यवस्थापनाने अधिक सतर्क राहुल काळजी घेण्याची गरज आहे. स्वयंशिस्त हा ह्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. शासन-प्रशासनाकडून शक्य तितकं जास्तीत जास्त नियंत्रण ठेवणं जाईलच. पण ‘मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक’ हेच योग्य आहे”, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांसाठी RBSK पथक सज्ज

“राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाचं पथक (RBSK) हे राज्यभरातील प्रत्येक शाळेमध्ये जात असतं. याच कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शाळेमध्ये डॉक्टरांच्या पथकाने भेट दिली पाहिजे, तपासणी केली पाहिजे हेच अपेक्षित आहे. आता करोनाच्या पार्श्वभूमीवर देखील जर कोणाला काही लक्षणं जाणवत असतील तर राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम पथकाने तातडीने त्याची दखल घेणं आवश्यक आहे. त्वरित सूचना देऊन, त्याबाबतच्या उपाययोजना देखील करणं महत्त्वाचं आहे, अशा सूचना आरोग्य विभागाच्या आरबीएसके पथकांना सांगितलं आहे”, अशी देखील माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.