Eknath Shinde On Shakti Peeth Mahamarg: महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे आज लोकार्पण पार पडले. मुंबई-नागपूर दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे आज (५ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर नुकताच हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या महामार्गाबाबत तसेच नियोजित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबतही भाष्य केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुख्यमंत्री महोदयांनी नुकताच शक्तीपीठ महामार्गाचा उल्लेख केला. हा प्रकल्प मराठवाड्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे. यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत विकास होईल आणि तेथील आत्महत्याही थांबतील. याचबरोबर, याचा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणालाही फायदा होणार आहे.”

दरम्यान, गेल्या काही दिवसांत ज्या भागांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, तेथील काही राजकीय पक्षांनी व शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “ज्यावेळी आम्ही समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले, तेव्हा खूप विरोध झाला. काहींनी विरोध करणाऱ्यांना राजकीय ताकद दिली. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. आज त्या शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गही अशाच पद्धतीने लोकांच्या हिताचा ठरेल.”

तत्पूर्वी, या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शक्तीपीठ महामार्गाबाबतही भाष्य केले होते. ते म्हणाले, “महायुतीच्या कार्यकाळातच या महामार्गाचे उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. आता अशाच प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला पुढच्या टप्प्यात करायचा आहे. हा शक्तीपीठ महामार्ग संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलणारा, मराठवाड्यात आर्थिक बदल घडवणारा असणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे.”

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण

मुंबई-नागपूर अंतर १६ तासांऐवजी केवळ आठ तासात पार करता यावे यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीचा आणि सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्चाचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला होता. राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७०१ किमी महामार्गातील नागपूर-शिर्डी दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर २६ मे २०२३ रोजी शिर्डी-भरवीर दरम्यानच्या ८० किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तर भरवीर-ते इगतपुरी दरमयानच्या २५ किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ४ मार्च २०२४ रोजी झाले होते.