सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह दुष्काळ, पीकविमा आणि महागाई अशा मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील विकास कामांवर भाषण केलं. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने सेटलमेंट्स होतात, असा खळबळजनक आरोप केला.

यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेत आव्हाडांचं वक्तव्य रेकॉर्डवरून काढण्याची मागणी केली. शहर विकास खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती देताना आव्हाडांनी हे विधान केलं.

विधानसभेत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शहर विकास खात्याच्या सर्व फाईल्स काही माणसं तपासतात. ते आर्किटेकबरोबर बसतात आणि फाईल्समधील त्रुटी काढतात. त्यानंतर मग बिल्डरला (विकासक) बोलवलं जात आणि त्याला समोर बसवून सेटलमेंट केली जाते. ही सेटलमेंट कुणाच्या नावाने होते? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने सेटलमेंट होते. मला खात्री आहे की त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही.”

हेही वाचा- “कलम ३७० रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध करत शंभूराज देसाई म्हणाले, “सेटलमेंट आणि त्याला जोडून मुख्यमंत्र्यांचं उल्लेख करणं बरोबर नाही. यावर आमची हरकत आहे. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केलेला भाग रेकॉर्डवरून काढून टाका. हे अजिबात सहन केलं जाणार नाही. येथे थेट मुख्यमंत्र्यांचा कुठेही संबंध येत नाही. तुम्ही सेटलमेंट वगैरे बोललाय, हे बिलकूल चालणार नाही, हा शब्द तातडीने रेकॉर्डवरून काढून टाका.”