अलिबाग- पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्या प्रकरणात शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दोषी ठरवले आहे. एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचा हमीपत्र आणि पाच हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

२०१९ च्या लोकसभा निवडणूक मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्रात घुसून जयंत पाटील यांनी तुम्ही पत्रकार काही बातम्या छापतात म्हणत मारहाण केली होती. या प्रकरणी २४ मे २०१९ रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा जयंत पाटील, पंडीत उर्फ सुभाष पाटील आणि अभिजित कडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबाग पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी या प्रकरणाचा तपास करून अलिबाग येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम बी अत्तार यांच्या न्यायालयात सुरू होती. सुनावणी दरम्यान एकूण १३ जणांच्या साक्षी नोंदणवण्यात आल्या, यात फिर्यादी, तपासिक अंमलदार, पंच आणि साक्षीदार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या, दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने माजी आमदार जयंत पाटील यांना भारतीय दंड विधान कलम ३२३ अन्वये दोषी ठरवले. त्यांना तुरुंगात पाठवण्याऐवजी अपराध प्रतिबंधक कायद्यानुसार एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमी पत्र लिहून देण्याचे तसेच ५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

गेली सहा वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून प्रसाद सुदाम पाटील, कविता परिट, नईमा घट्टे, यांनी या प्रकरणात काम पाहीले.