शिवसेना उबाठा गटात प्रवेश केल्यानंतर अभिनेते किरण माने चांगलेच चर्चेत आहेत. तसे ते आधीपासूनच आपली मते बिनधास्त व्यक्त करत होते. पण राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतांना आणखी धार आली. तसेच विरोधकांवर उपरोधिक अंदाजात त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. आता त्यांनी भाजपाचे नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. अभिनेता आणि लेखक असलेल्या संकर्षण कऱ्हाडेने एका युट्यूब वाहिनीसाठी चंद्रकांत पाटील यांची एक मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत पूर्ण पाहणाऱ्या व्यक्तीसाठी किरण मानेंनी १५ लाखांची ऑफर दिली आहे.

किरण मानेंची नेमकी ऑफर काय?

‘राजकारणापलीकडलं बरंच काही!’, या शीर्षकाखाली चंद्रकांत पाटील यांची ही मुलाखत पार पडली. चंद्रकांत पाटील यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरही ती शेअर करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपला लहानपणापासूनचा प्रवास, शिक्षण, अभाविपमधील संघर्षाचे दिवस याबद्दलच्या आठवणी या मुलाखतीत सांगितल्या आहेत.

Video : “इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही”, संकर्षण कऱ्हाडेची राजकीय परिस्थितीवर कविता; म्हणाला…

किरण माने यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट टाकून या मुलाखतीवर खोचक टोला मारला आहे. “थोर राजकारणी चंद्रकांत पाटील उर्फ चंपा यांची शक्य तितकं भयाण लाचार हसत संकर्षण कर्‍हाडेनं घेतलेली मुलाखत जो कोणी पूर्ण पाहून दाखवेल त्याला पंधरा लाख. ही माझी गॅरंटी!”, अशा आशयाची पोस्ट मानेंनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

मला अभाविपंवाले भेटले आणि…

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगताना म्हटले की, मुंबईच्या सिद्धर्थ कॉलेजमध्ये दाखल झाल्यानंतर अभाविपंच्या लोकांशी माझा संपर्क झाला. माझे आई-वडील निरक्षर असल्यामुळे त्यांचा शिक्षणाशी संबंध नव्हता. मीही गिरणीमध्ये काम करावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र मी आणि माझ्या बहिणीने मेहनतीने शिक्षण पूर्ण केले. पदवी मिळविल्यानंतर दोन वर्षांसाठी अभाविपंचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर फिरलो. हा निर्णय घेण्याआदी घरच्यांशी वाद झाले, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन गडकरींमुळे भाजपामध्ये प्रवेश

चंद्रकांत पाटील यांनी भाजपामध्ये येण्याचाही किस्सा या मुलाखतीमध्ये सांगितले. लग्न करण्यासाठी १९९३ साली ते अभाविपंमधून बाहेर पडले आणि २००४ साली नितीन गडकरी यांच्या आग्रहामुळे भाजपामध्ये परतले. पुढे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीला उभा राहून निवडणूक जिंकली आणि पुढचा प्रवास सुरू झाला, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.