अलिबाग : किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई गोवा महामार्ग, माणगाव निजामपूर मार्गे पाचाड मार्ग आणि महाड ते पाचाड ली मार्गावरील सर्व प्रकारच्या अवजड वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

किल्ले रायगडावर तारखेनुसार ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने गडावर विवीध सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील विवीध भागातून मोठ्या संख्येनी शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. हीबाब लक्षात घेऊन गडावर दाखल होणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मुंबई गोवा महामार्ग, माणगाव- निजामपूर- पाचाड मार्ग आणि महाड- नातेखिंड ते पाचाड मार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे ते कशेडी पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

दिनांक ५ मे ला सायंकाळी ४ वाजल्यापासून ६ जूनला रात्री १० वाजेपर्यंत तिन्ही मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत महामार्गावरून १६ टन आणि त्याहून अधिक क्षमतेचे ट्रक, कंटेनर, मल्टी अँक्सल व्हेईकल, ट्रेलर्स, रेती आणि खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या बाबतची वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूध, इंधन, गॅस, औषध पुरवठा, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. दरवर्षी तारीख आणि तिथी नुसार रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला जातो. यासाठी दरवर्षी साधारणपणे २५ ते ३० हजार शिवभक्त रायगड किल्ल्यावर येत असतात. गडाकडे जाणारे मार्ग अरूंद असल्याने, मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अवजड वाहतूक नियंत्रित केली जात असते. या शिवाय शिवभक्तांची वाहने पाचाड येथे थांबवली जाते. येणाऱ्या शिवभक्तांना विशेष एस टी सेवेने गडावर पाठवले जाते. यावर्षीही पाचाड येथे वाहतुक नियमन केले जाणार आहे.