सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात कोसळलेल्या हंगामपूर्व पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार हे नुकसान जवळपास २९.३७ लाख रुपयांचे असल्याचे समोर आले आहे. आंबा, कोकम, उन्हाळी भात, नाचणी, मिरची यांसारख्या पिकांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्हा कृषी विभागाने १ ते ३१ मे दरम्यान झालेल्या या नुकसानीची पाहणी केली असून, जिरायत पिके, बागायत पिके आणि फळ पिके अशा तिन्ही पातळ्यांवर पंचनामे पूर्ण केले आहेत. या हंगामपूर्व पावसामुळे जमिनीत गाळ साचून तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३१ गावांमध्ये ८८९ शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला असून, एकूण १०१.६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये ५० हेक्टर क्षेत्रात जमिनीत गाळ साचल्याने नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचा विचार करता, १३१ गावांमध्ये जिरायत पिकांचे ४.६१ हेक्टर, बागायत पिकांचे ४०.१० हेक्टर आणि फळपिकांचे ५६.९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या नुकसानीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक फटका कुडाळ तालुक्याला बसला आहे, जिथे ३२.८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर दोडामार्ग तालुक्यात सर्वात कमी, म्हणजेच ०.४५ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याची नोंद आहे. या नुकसानीचा तपशीलवार अहवाल लवकरच शासन दरबारी सादर करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. हंगामपूर्व पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोकम, काजू, आंबा, नाचणी, मिरची या मुख्य पिकांसोबत उन्हाळी भात पिकालाही या पावसाचा फटका बसला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांमुळे पावसाने उघडीप साधल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.