सावंतवाडी : आंबोली येथील प्रसिद्ध धबधबे सुरू झाल्याने आज, रविवारी आंबोली घाटात पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यातच उद्या, १६ जूनपासून महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू होत असल्याने प्रदीर्घ सुट्टीनंतर बाहेर पडलेले पर्यटक आपल्या घराकडे परतत होते. या दोन्ही कारणांमुळे आंबोली घाटात वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या वाहतूक कोंडीचा फटका अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना बसला. तासनतास एकाच ठिकाणी खोळंबून राहिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले की, “आम्ही ही गर्दी वेळीच दूर करण्यासाठी प्रयत्न केला. एकीकडे पर्यटक आपल्या गावी जात होते, तर दुसरीकडे आंबोलीतील धबधब्यांमध्ये पाणी आल्याने पर्यटक आंबोली धबधब्यावर गर्दी करत होते. या दोन्ही प्रकारच्या वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली. आम्ही ही कोंडी वेळीच सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.”
आंबोली धबधबे सुरू झाल्याने निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक शनिवार, रविवारी आंबोलीकडे धाव घेतात. मात्र, सुट्ट्या संपून शाळा सुरू होण्यापूर्वीचा रविवार असल्याने अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केला होता. या दुहेरी गर्दीमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी प्रशासनासाठी एक आव्हान ठरली.