विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख घटक पक्षांची बैठक पार पडली. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्यं, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे उद्योग यासह राज्यातील सद्यस्थितीस असलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये काही निर्णय घेण्यात आले त्याबाबत या बैठकीनंतर महाविकास आघाडीने पत्रकारपरिषद घेत माहिती दिली.

महाविकास आघाडीच्या या पत्रकारपरिषदेस शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसनेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह तिन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.

या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “असं पहिल्यांदाच दिसतय की महाराष्ट्रात फुटीरतेची बीजं टाकली जात आहेत. काही गावं म्हणतात आम्हाला कर्नाटकात जायचं, तर काही तेलंगणात, गुजरातमध्ये जायचं असं म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं.

हेही वाचा – Himachal Pradesh Election Exit Poll : हिमाचलमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत; सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम राहण्याची चिन्ह!

वछत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतुपरुस्सर केला जात आहे. कोण करतय हे सांगण्याची गरज नाही. कर्नाटक सरकार फार आक्रमकतेने आपल्या महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. आपल्या राज्याला सरकार आहे की नाही? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.”

याशिवाय “मला भीती अशी आहे की गुजरातच्या निवडणुकी अगोदर यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. तसंच येत्या काही महिन्यांमध्ये कर्नाटकाच्या निवडणुका येत आहेत, मग कर्नाटकच्या निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील गावे खरोखर तोडणार आहेत का?, महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत हे कळणार कधी? आपले मंत्री बेळगावला जाणार असं समजलं होतं, मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर त्यांचा दौरा रद्द झाला. एवढा नेभळट महाराष्ट्र कधी पाहीला नव्हता. हे नेभळट सरकार म्हणजे महाराष्ट्र नव्हे, हे सांगण्याची आता वेळ आली आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, सीमावासीयांना पाठिंब्याची गरज असताना विरोधी पक्षापैकी कोणी तिथे दौरा करणार आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्ही कधीही जाऊ शकतो. यापूर्वीही आमचे काहीजण गेलेले आहेत. छगन भुजबळ, संजय राऊत हे इथे आहेत. आता शेवटी कोणाची जबाबदारी आहे, ते ती जबाबदारी स्वीकारणार आहेत की नाही? ही काय हिंदुस्थान-पाकिस्तानची सीमा रेषा नाही, पण जसं कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलत आहेत तसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आवंढा गिळून तरी काही तरी बोलणार का? की ते सुद्धा गुवाहाटीला जाऊन बोलणार आहेत. सरकराने जाहीर करावं त्यांना जमत नाही. मग आम्ही काय करायचं ते करतो. अगदी सरकार चालवण्यापासून बेळगावात जाण्यापर्यंतची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.”