पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ सुरू करावे. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. या वेळी त्यांनी मोहोळ, माढा, करमाळा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने शेत, घरांचे मोठे नुकसान झाले होते.
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या तालुक्याची पाहणी केली. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीचे पंचनामे लवकर करण्यात येतील. तसेच लवकरात लवकर शासकीय मदत आपल्याला मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर माढा तालुक्यातील कुर्डूवाडी, रोपळे, म्हैसगाव व रांजणी या चार मंडळात अतिवृष्टी झाली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी कुर्डूवाडीतील अतिवृष्टीने ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच केळी बागेच्या नुकसानीची ही पाहणी करून केळी उत्पादक शेतकरी बालाजी शिरसकर यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. त्याप्रमाणेच सीना कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडल्याने तांबे वस्ती पाण्यात जाऊन तेथील कुटुंब पाण्यात अडकले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद स्वतः पाण्यात थांबून संबंधित कुटुंबाला बचाव पथकामार्फत सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. तसेच स्थलांतर केलेल्या कुटुंबाला अन्नधान्य पुरवठा करण्याबाबतही प्रशासनाला सूचना दिल्या.
करमाळा तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला असून, अनेक गावांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संगोबा येथे सीना नदीच्या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा प्रशासन पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
तसेच संबंधित तहसीलदार यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे तत्काळ सुरू करावे. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. या वेळी त्यांनी मोहोळ, माढा, करमाळा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.