सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी दूर अंतरावरील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून निघालेल्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी धाराशिव जिल्ह्याची सीमा ओलांडून सोलापूर जिल्ह्यात येऊन विसावला. विठ्ठलाच्या नामघोषासह टाळ मृदंगाच्या तालावर भजने, अभंग सादर करीत पायी आलेल्या या पालखीचे जिल्ह्याच्या सीमेवर उळे गावात स्थानिक भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आदींनी स्वागत केले.

रात्री हा पालखी सोहळा उळे गावात मुक्कामासाठी विसावला. बुलढाणा येथून शेगाव संत गजानन महाराज संस्थांनामार्फत शिस्तबद्धरीत्या निघालेल्या या पालखी सोहळ्यात सुमारे सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. अंगावर पांढरा शर्ट, पांढरी विजार, डोक्यावर पांढरी गांधी टोपी परिधान केलेल्या आणि हातात उंच भगवी पताका घेतलेल्या वारकऱ्यांमध्ये भक्ती ऊर्जा दिसत होती. या वारकऱ्यांमध्ये तरुणाईचा सहभाग उल्लेखनीय आहे. टाळ-मृदंगाच्या तालावर खड्या आवाजात म्हटली जाणारी भजने, अभंगांचे श्रवण करताना गावकऱ्यांमध्येही नवऊर्जा संचारली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याच्या तामलवाडी येथून सोलापूर जिल्ह्यात उळे गावाच्या शिवारात शेगावच्या राणाचे उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आगमन होताच स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले. रात्रीच्या उळे येथील मुक्कामानंतर उद्या, रविवारी सकाळी पालखी सोहळ्याचे सोलापूर श्री रूपाभवानी मंदिराजवळील चौकात आगमन होणार आहे. शहरातील दोन रात्रीच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा मंगळवेढा मार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे.