सोलापूर : पावसाळी हंगाम सुरू होण्यापूर्वीच मे महिन्यात सातत्याने पडणाऱ्या पावसाने कहर केला असतानाच दुसरीकडे या पावसाच्या जोरावर उजनी धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. काल मंगळवारी सकाळी धरणातील पाण्याचा मृत पातळीतील साठा संपुष्टात येऊन उपयुक्त पाणीपातळीत गेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी, बुधवारी दिवसभरात धरणात ४.२० टक्के म्हणजे २.२६ टीएमसी पाणी वाढले. सायंकाळी धरणात एकूण पाणीसाठा ७०.५९ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ६.४३ टीएमसी इतका मोजण्यात आला. धरण उपयुक्त पातळीवर १२.९३ टक्के भरल्याचे उजनी धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या २१ मे रोजी उजनी धरणात मृत पातळीत २२.९३ टक्के इतका (सुमारे ४९ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक होता. परंतु, नंतर सुरू सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सकाळी सहा वाजता धरणात एकूण ६८.३३ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. उपयुक्त पातळीतील टक्केवारी ८.७३ इतकी होती. त्यावेळी दौंड येथून धरणात येणारी पाण्याची आवक ३४ हजार ८८५ क्युसेक होती. परंतु, सायंकाळी ही आवक सुमारे ११ हजार क्युसेकने कमी होऊन २३ हजार ५०१ क्युसेकपर्यंत सुरू होती. पावसाच्या जोरावर धरणात गेल्या आठ दिवसांत सुमारे १९ टीएमसी पाणीसाठा वधारल्याचे दिसून येते.