राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यासंदर्भातील माहिती देताना सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सक्तवसुली संचालनायलयाकडून (ईडी) केल्या जात असणाऱ्या कारवायांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अगदी मिश्कील शब्दामध्ये उत्तर दिलं. मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेने ईडीच्या कारवायांचा मुद्दा उचलून धरलाय. कालच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआयवरुन केंद्रावर निशाणा साधला होता.

नक्की वाचा >> राणे विरुद्ध शिवसेना प्रकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी काही…”

ईडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळे यांनी, “ईडीचा कायम राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच झालाय,” असं हसत उत्तर दिलं आणि त्या निघून गेल्या. सध्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चर्चेत आहे. आत्तापर्यंत ईडीनं देखमुख यांना पाच वेळा समन्स बजावले आहेत. पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही देशमुख चौकशीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत. मात्र सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य हे २०१९ च्या निवडणुकाआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयाला भेट देण्यासंदर्भातील प्रकरणाला अनुसरुन होतं. शिखर बँक प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पर्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी पवार हे २७ सप्टेंबर २०१९ रोजी ईडीच्या कार्यालयात जाणार होते. त्यानंतर मुंबईत प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला. पोलिसांनीही तेव्हा कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये अशी विनंती केली होती. होय नाय होय नाय म्हणता म्हणता अखेर पवरांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही आठवड्यांनी झालेली निवडणूक आणि त्यामध्ये राष्ट्रवादीला अपेक्षेहून अधिक यश मिळाल्याने पवारांची ही ईडी खेळी यशस्वी ठरल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये रंगल्या होत्या.

नक्की वाचा >> छत्रपती संभाजी महाराजांशी राणेंशी तुलना : संजय राऊत म्हणाले, “भिडेंना या असल्या…”

राऊतांनाही साधला केंद्रीय संस्थांवर निशाणा…

कालच संजय राऊत यांनी केंद्रीय संस्थांवर टीका केली होती. ईडी आणि सीबीआयसारख्या संस्था या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड पश्चिम बंगालमध्ये वेगाने काम करत असल्याचा टोला राऊतांनी लगावला. इतर राज्यांमध्ये काही घडत नाही अशी गोष्ट नाहीय तिथे आमच्यापेक्षा भयंकर गोष्टी घडतात पण या संस्था कोणाच्या मागे लागतात तर महाराष्ट्रातील अनिल देशमुख असो किंवा आमचे सहकारी सरनाईक यांच्या, असं म्हणत राऊतांनी केंद्रीय संस्थांवर टीका केली. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, माझ्याकडे १०० नावं तयार आहेत मी देतो यादी कोणाला नोटीसा पाठवायच्या याची असं म्हणत ईडीचे माजी प्रमुख अधिकारी भाजपामध्ये सहभागी होतात. तुम्ही इडीत बसून भाजपाच चालवत होता ना?, असा टोलाही लगावला.

नक्की वाचा >> नितेश राणेंनी फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना करुन दिली ‘एक आठवण’

…म्हणून नागपूर दौरा

मागील अनेक महिन्यांपासून नागपूरमधील राष्ट्रवादी कार्यकारणीची बैठक झाली नाही आणि अनेकांच्या भेटी झाल्या नव्हत्या. त्यामुळेच मी दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून पुढील दोन दिवसांमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने पक्षासंदर्भातील महत्वाचे निर्णय आणि कामे हतावेगळी करण्याचा विचार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.