महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाजपासह महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात अमित शाह यांच्याशी काय बोलणं झालं? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय चर्चा होत होत्या? याचे तपशील थोडक्यात सांगितले आहेत. तसंच देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आता टीका केली आहे.

राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं राज्यसभाही नको, विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देते आहे हे मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आता विधानसभेच्या तयारीला लागा, पुढच्या गोष्टी पुढे होतील असं राज ठाकरेंनी म्हटलं. आता याच निर्णयावर ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आणि सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले राजन साळवी?

“शिवसेनेतून फारकत घेतल्यापासून राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केला. नवा पक्ष स्थापन केल्यानंतर लोकांच्या साहजिक काही अपेक्षा होत्या. गेल्या काही वर्षांमधली मनसेची महाराष्ट्रातली स्थिती पाहिली तर ती चांगली नाही. सुरुवातीला त्यांचे १३ आमदार निवडून आले होते. सध्या त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाठिंबा देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. भाजपाची आणि मोदींची लोकप्रियता कमी होते आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखा आहे.”

सुषमा अंधारेंनी काय म्हटलं आहे?

सुषमा अंधारे यांनीही राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “काय झालं ते मला काही माहीत नाही दादा, काय झालं की, हे सगळं चालू होतं, तेव्हा मी म्हणींचं पुस्तक वाचत होते. मला कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी काहीतरी म्हण आहे, त्याचा अर्थ मी शोधत होते”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

महायुतीला पाठिंबा देताच देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले, “भक्कम महाराष्ट्राच्या..”

राज ठाकरेंच्या भाषणाचा आमच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. उलट त्यांनी मोदींना पाठिंबा देणं आमचा आत्मविश्वास वाढवणारं आहे. ज्या अर्थी इतके सगळे लोक एका घायाळ वाघाला आणि ८४ वर्षीय शरद पवारांना हरवण्यासाठी ताकद लावत आहेत त्याअर्थी त्यांना अजूनही महाराष्ट्रात आपण जिंकू अशी खात्री वाटत नाही असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.