मराठा आरक्षणाचा पेच अद्यापही सुटलेला नाही. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तसंच, त्यांनी महाराष्ट्रभर दौरे चालू केले आहेत. परंतु, मराठ्यांना आरक्षण देण्यावरून मराठा समाजातच अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. सातारा येथे गांधी मैदानावर जरांगे मनोज जरांगे यांची शनिवारी सभा झाली. या सभेला मराठा समाजातील काही आंदोलकांनी विरोध केला होता.

“आरक्षण हवे असेल तर मराठ्यांना कुणबी हा शब्द धारण केलाच पाहिजे. ज्यांना कुणबी म्हणवून घेण्याची लाज वाटते त्यांना आरक्षण तर मिळणार नाहीच पण त्यांनी शेतीदेखील करू नये, अशा शब्दांत मनोज जरांगे मराठा समाजातील विरोधकांवर टीका केली. पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील सभेचे ठरलेले स्थळदेखील या विरोधामुळे बदलण्यात आले होते.

मराठ्यांचे ‘सरसकट कुणबीकरण’ या जरांगेंच्या मागणीला कडाडून विरोध करत या मराठा आंदोलकांनी त्यांच्यावर टीका केली होती. तसेच जरांगे यांच्या आंदोलनामागे समाजाची मराठा ही असलेली ओळख पुसण्याचा डाव असल्याचा आरोपही केला होता. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी स्वसमाजातील विरोधकांवर साताऱ्यात येऊन टीकास्त्र सोडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरांगे म्हणाले, की लढाई करणारे मराठे तर शेती करणारे हे कुणबी असतात. मग सध्याचे लोक लढाई करत आहेत की शेती हे सांगावे. शेती व्यवसाय करूनही ज्यांना कुणबी म्हणवून घेण्याची लाज वाटते त्यांना आरक्षण तर मिळणार नाहीच पण मग त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे. समाजातील मोठा वर्ग आता जगण्याची लढाई लढत आहे. त्याला या असल्या अभिमानापेक्षाही कुणबी हा शब्द धारण करत आरक्षण मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना अजून मराठा शब्दावर ठाम राहायचे त्यांनी राहावे. पण आम्हाला आरक्षण हवे असल्याने आम्ही कुणबी शब्द धारण करणार आहोत,’’ असे जरांगे यांनी सांगितले.