सातारा : शाहिरी परंपरेने लोकमानसाप्रमाणेच लोकचेतना जागविण्याचे, चेतविण्याचे कार्य केले. या कलेचे स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देश घडविण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. शाहिरी कलेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच या कलेसमोरील आव्हानांची चर्चा होण्याच्या दृष्टीने शाहिरी महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. ही कला जगभरात आणि जगासमोर मांडण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले.

सातारा येथे ९ ते ११ जून या कालावधीत शाहू कला मंदिरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे (दादा) महाराज भोसले रंगमंचावर झालेल्या शाहिरी महोत्सवाचा सांगता समारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहसंचालक नीलेश धुमाळ, मराठी साहित्य कार्यवाहक शिरीष चिटणीस, प्रतापगड संवर्धन समितीचे सदस्य पंकज चव्हाण, विक्रम पावस्कर यांच्यासह विविध पदाधिकारी, शाहीर यांची उपस्थिती होती.

शेलार यांनी आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृती, लोकनाट्य, लोकवाद्य याबद्दल जनजागृती करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देवून चर्चा घडवून आणण्यासाठी पुढील मार्चपर्यंत एक हजार २०० कार्यक्रम घेण्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे उद्दिष्ट असल्याचे सांगून या कार्यक्रमांमध्ये चर्चा, परिसवांद, स्पर्धा आणि लोकसहभाग यांचा समावेश असेल, असे स्पष्ट केले. शाहिरी परंपरा ही सामाजिक प्रबोधनाला, सामाजिक चळवळीला उभारी देणारी परंपरा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वातंत्र्य काळात शाहिरी परंपरेने लोकजागृती, लोकशिक्षण याद्वारे लोकचेतना जागविल्या. राष्ट्रनिर्मितीमध्ये या शाहिरी परंपरेने मोलाचे योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख अशा सगळ्या शाहिरी परंपरेतल्या मंडळींनी आपले जीवन तळहातावर घेऊन पेटविलेला अंगार विसरता येणार नाही. म्हणूनच शाहीर साबळे यांनी गायलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र गीताचा दर्जा मिळाला. या कलेचे जतन करून ही कला जगात व जगासमोर मांडण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न केले जातील, असेही सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी सांगितले.