सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सेंट्रल टेक्सटाईल टॉवेल कारखान्याला लागलेली भीषण आग आणि त्यात कारखान्याच्या मालक आणि कामगारांच्या कुटुंबीयांसह आठ जीवांचे गेलेले बळी आणि कोट्यवधींची झालेली वित्तहानी प्रशासकीय यंत्रणेच्या बेपर्वाईचे निदर्शक आहे, असा थेट आरोप करीत, संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

यासंदर्भात प्रहार संघटना आणि एमआयएम पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात सेंट्रल टेक्सटाईल टॉवेल कारखान्याच्या मालकाच्या वारसदारांसह मृत कामगारांचे कुटुंबीयही होते. घडलेली भीषण दुर्घटना अतिशय दुःखद आहे. त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी महापालिका प्रशासनाने निदान यापुढे तरी सजगता दाखवावी, अशा शब्दांत गाऱ्हाणे मांडताना दुर्घटनेत बळी गेलेले टेक्स्टाईलचे मालक हाजी उस्मान मन्सुरी यांचे पुत्र व अन्य नातेवाइकांना आयुक्त डॉ. ओंबासे यांच्या समोर अश्रू आवारले नाहीत. आयुक्त डॉ. ओंबासे यांनीही त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार बच्चू कडूप्रणीत प्रहार संघटना आणि एमआयएम पक्षाच्यावतीने शिवछत्रपती रंगभवन येथून सोलापूर महापालिकेवर मूकमोर्चा नेण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी हातात काळ्या फिती बांधल्या होत्या. प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, एमआयएम पक्षाचे शौकत पठाण, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, माजी नगरसेविका वाहिदाबानो भंडाले आदींचा त्यात समावेश होता.

यावेळी झालेल्या चर्चेत मृतांच्या नातेवाइकांसह इतरांनी प्रामुख्याने महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेच्या त्रुटीवर बोट ठेवत आयुक्त डॉ. ओंबासे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अग्निशमन यंत्रणा अतिशय तोकडी ठरली असून ती अक्षम्य आहे. त्यामुळे या घटनेची तत्काळ निष्पक्ष चोकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशा भीषण आगीच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून संवेदनशीलता दाखवून उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या १५ दिवसांनंतर प्रहार संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांनी, घडलेल्या भीषण दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत, त्याची तातडीने चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. अग्निशमन यंत्रणा बळकट करून पुन्हा कोठेही आगीच्या दुर्घटना होणार नाहीत, याची दक्षता घेऊ, अशीही ग्वाही त्यांनी दिली.