अलिबाग : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात, ईसिएल फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तीन पदाधिकाऱ्यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. त्यांना पुन्हा ११ तारखेला चौकशीसाठी खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, ईसिएल फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना पोलीसांनी नोटीस बजावण्यात आली होती. यानुसार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणींद्रनाथ काकरला आणि इतर तीन पदाधिकारी कागदपत्रांसह, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हजर झाले होते. दिवसभर सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मात्र कंपनीने सादर केलेली माहिती ही अपुर्ण आणि विस्तृत स्वरूपात नसल्याने कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना ११ ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी दहा वाजता खआलापूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी ईसिएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज गृपच्या तक्रार नोंदवली होती. यानंतर ईसिएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज गृपच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या नंतर पोलीसांनी गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली आहे. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
आज दिवसभर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. मात्र त्यांनी पोलीसांना उपलब्ध करून दिलेली माहिती त्रोटक स्वरुपाची आणि अपुर्ण आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले आहे. –अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधिक्षक