लातूर: पीक विम्याचे अनेक प्रश्न आहेत, एकाच गटातील एका शेतकऱ्याला पिक विमा मिळाला तर दुसऱ्याला मिळाला नाही असे अनेक प्रश्न आहेत आगामी काळात हे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महाराष्ट्र दिनी जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेस खासदार डॉक्टर शिवाजी काळे, आ. संजय बनसोडे ,आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा- घुगे, जिल्हा पोलीस प्रमुख सोमय मुंडे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आदी उपस्थित होते.
मागील वर्षातील पिक विम्याची रक्कम लाभार्थींना योग्य प्रमाणात मिळालेली नाही त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. नवीन वर्षापासून पिक विम्या च्या संबंधात नवे नियम करण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील असे भोसले म्हणाले. लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे भोसले म्हणाले. उदगीर येथील दूध प्रकल्प सुरू करण्याची भूमिका शासनाची नाही.
मात्र त्या परिसरातील लोकांची मागणी यासाठीची आहे त्यामुळे शासन स्तरावर यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे भोसले यांनी सांगितले .दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा तयार आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचे अनावरण व्हावे ही आपली इच्छा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची तारीख मिळताच अनावरणाचा कार्यक्रम होईल असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ज्या गावात पाणी टंचाईच्या समस्या आहेत त्यांच्या मागणीनुसार टँकर देण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे. सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी पोहोचेल यासाठी काळजी घेतली जात आहे. जलजीवन योजनेची कामे ज्या गावात अर्धवट आहेत व रखडलेली आहेत त्यासंबंधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना आढावा बैठक घेण्याच्या सूचना दिल्या असून आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्याचे ही सुचित करण्यात आले असल्याचे भोसले म्हणाले.