गडचिरोली-चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या पत्रात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये निलज येथील ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयातील एका प्राध्यपकाचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रा. पद्माकर तानबाजी मडावी (वय ४२, रा. कोरेगाव चोप) आणि संजय मारोती उके (वय ४०, रा. कुरुड) अशी मृतांची नावे आहेत. यांपैकी प्रा. मडावी हे निलज (ता. ब्रह्मपुरी) येथील ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते. सध्या सीमाबंदीमुळे हे दोन मित्र मंगळवारी संध्याकाळी डोंग्याने वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यातील खरकाडा घाटावर पोहोचले. नावाड्याला आम्ही आंघोळ करतो असे सांगून ते पाण्यात उतरले. संध्याकाळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. त्यानंतर सकाळी त्यांचे मृतदेह दिसून आले. त्यांची दुचाकी नदीच्या गडचिरोली जिल्हयातील तीरावर होती.

लॉकडाउन असल्यामुळे सर्व मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडा पहारा आहे. ई-पास असल्याशिवाय जिल्ह्याच्या सीमा ओलांडता येत नाहीत. पोलिसांच्या भीती पोटी नागरिकांनी चोरवाटा शोधून काढल्या आहेत. प्रा. मडावी ब्रह्मपुरी येथे राहायचे त्यांची पत्नी किसान विद्यालय कोरेगाव तह. देसाईगंज येथे शिक्षिका आहे. तसेच ते मुळचे कोरेगाव येथील रहिवासी आहेत. मंगळवार १२ मे रोजी गावाकडे जाण्यासाठी कुरुड येथील मित्र संजय उके यांच्यासोबत ते ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या खरकाडा घाटावरुन येत होते. येताना आंघोळ करण्याचा मोह न आवरल्यामुळे दोघेही खोल पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.

बुडालेल्या या दोघांचेही मृतदेह पोलिसांना मिळाले असून ब्रह्मपुरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The two drowned while crossing the river in a lock down among the dead was a professor aau
First published on: 13-05-2020 at 11:39 IST