“जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारतात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबानमध्ये केले असते, तर त्यांना तालिबाननं चौकात फटके मारले असते..” असं विधान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात सध्या भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या वक्तव्याबद्दल जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे. शिवाय, भाजपाच्या काही नेत्यांनी जावेद अख्तर यांना थेट अल्टिमेटही दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे.

“मला असं वाटत हा एक अयशस्वी प्रयत्न आहे. नेहमीच देशाच्या संदर्भात त्यांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे. हेच वाक्य तालिबानमध्ये जाऊन, त्यांनी अशा पद्धतीचं एखादं वाक्य वापरलं असतं तर चौकात त्यांना तालिबानी लोकांनी फटके मारले असते.” असं सुधीर मुनगंटीवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

तसेच, “या ठिकाणी जर या संस्था आणि संघटना या तालिबान्यांसारख्या वागल्या असत्या, तर जसं अफगाणिस्तानच्या एखाद्या चौकात उभा राहून तालिबान्यांना शिव्या दिल्यानंतर, काय हाल होता हे तुम्ही पाहिलं असेल. तसे हाल इथं झाले नसते? पण इथे त्यांच्या या वक्तव्याची काही लोकांनी, मीडियामध्ये देखील मोठ्याप्रमाणावर नोंद घेतली. याचा अर्थ इथे देशात ज्यांची सत्ता आहे, ते रामराज्य आणण्याची कल्पना करणारे लोक आहेत. बजरंग दलाबद्दल नाव घेताना, त्यांच्या मनात बजरंग किंवा राम भक्ताबद्दलची जी काही असुया आहे, ती अप्रत्यक्ष व्यक्त झाली. अशी कोणतीही घटना देशात झाली नाही. त्यांच्या घरावर कुणी लोक गेले नाहीत किंवा केंद्राने पोलीस पाठवले नाहीत. त्यांना अटक करत ५०५(२)चा गैरवापर केला नाही.” असंदेखील मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलं आहे.

तालिबानी रानटी तर RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे अशाच मानसिकतेचे – जावेद अख्तर

”आरएसएस, विश्व हिंदू परिषद हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जर संधी मिळाली तर ते सीमाही ओलांडतील.”, असे जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावर भाजपा नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधाने मागे घेण्याची मागणी केलेली आहे.

जावेद अख्तर यांच्या मुंबईतील घराबाहेरील सुरक्षा वाढवली; भाजपाकडून केली जातेय माफीची मागणी

दरम्यान, जावेद अख्तर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपाने अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अख्तर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कालच भाजपाने या ठिकाणी जावेद अख्तर यांनी माफी मागावी यासाठी आंदोलन केलं होतं.