वडसा वन विभागाने जेरबंद केलेल्या वाघिणीला रेडिओ कॉलर लावून मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास चपराळा अभयारण्यात मुक्त करण्यात आले. पिंजऱ्याचा दरवाजा उघडताच वाघिणीने पिंजऱ्याबाहेर उडी घेऊन जंगलात धूम ठोकताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुक्त श्वास घेतला.
गडचिरोली जिल्हय़ातील वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या रवी या गावाच्या परिसरात वाघिणीने धुमाकूळ घातला होता. तिला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वातील बेशुध्दीकरण पथकाने १२ ऑगस्टला जेरबंद केले होते. त्यानंतर या वाघिणीला गडचिरोली येथून थेट नागपूर लगतच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात नेण्यात आले. तेथे मागील १५ दिवसांपासून मुक्कामी आहे. अशातच वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वाघिणीला चपराळाच्या जंगलात सोडण्याचा निर्णय २३ ऑगस्ट रोजी घेतला. परंतु त्या वाघिणीला गडचिरोली जिल्हय़ात पुन्हा सोडू नये, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनीही वनमंत्र्यांकडे ही मागणी लावून धरली. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. स्थानिकांचा आग्रह लक्षात घेता वन विभाग निर्णय बदलतो की काय असे वाटत होते. परंतु वन खाते निर्णयावर कायम राहिले.
दरम्यान, या वाघिणीला गोरेवाडा प्रकल्पातच रेडिओ कॉलर लावण्यात आली. त्यानंतर वाघीण गोरेवाडा प्रकल्पात काही वेळ होती. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात वाघिणीला रात्री उशिरा गडचिरोली जिल्हय़ातील चपराळाच्या जंगलात आणण्यात आले. मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास चपराळा अभयारण्यात वाघिणीला पिंजऱ्यातून मुक्त करण्यात आले. पिंजरा उघडताच वाघिणीने जंगलात धूम ठोकली. या वाघिणीला रेडिओ कॉलर लावले असल्याने आता तिच्यावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे. यावेळी चंद्रपूर व गडचिरोलीचे मुख्य वन संरक्षक विजय शेळके, ताडोबा अंधारीचे क्षेत्र संचालक त्रिवेदी, गडचिरोलीचे वनाधिकारी, गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक उदय पटेल, वनपरिक्षेत्र अधिकारी व वन पथकातील इतर कर्मचारी उपस्थित होते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक त्रिवेदी यांना विचारणा केली असता, वाघिणीला चपराळा येथे आणल्यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजता जंगलात मुक्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.