Final Phase of Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मार्ग आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. ७०१ किमीचा हा महामार्ग असून देशातील सर्वांत रुंद महामार्ग आहे. दरम्यान, या महामार्गासाठी लागलेल्या सिमेंट, स्टिलची आकडेवारीच आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. उद्घाटनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांनी हा प्रकल्प सुरू केला तेव्हा अनेकांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे एक मीटिंग झाली. सर्वांनी आम्हाला तिथं सांगितलं की आपल्याला विरोध करायचा आहे. हा प्रकल्प अजिबात होऊ द्यायचा नाही. पण ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथरावांनी जमिनीचा दर जाहीर केला, तेव्हा आम्हाला समर्थन देणाऱ्यांनी पाठ फिरवली आणि त्यांनी जाऊन पैसे घेतले आणि समृद्धी महामार्गाला जमिनी देऊन पाठिंबा दिला.”

स्वच्छतागृह आणि हॉटेल्ससाठी टेंडर काढले

ते पुढे म्हणाले, “आज ८ हजार ८०० हेक्टर जमीन एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी घेतलेली आहे. यामध्ये ५४६ एकर वनविभागाची जमीन आहे. जवळपास १९०३ लहान मोठे ब्रिज केले आहेत. डिसेंबर २२ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात केली तेव्हा २ लाख वाहने येथून जात होती, आता मे २५ मध्ये १० लाख वाहनं जायला लागली. ही संख्या अशीच वाढत जाणार आहे. आता थोड्याश्या गोष्टी करायच्या आहेत. स्वच्छतागृह, हॉटेल्ससाठी टेंडर काढले गेले आहेत. लोकांच्या मनातील समस्या दूर करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं आहे. ७०१ किमी लांबीचा देशातील सर्वाधिक रुंदीचा हा मार्ग आहे.”

१० जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प

“लवकरच पुणे-मुंबईचा रस्त्याचे काम करतोय, तिथे जगातील पहिल्या पाचमध्ये सर्वांत रुंदीचा ब्रिज आणि टनेल होणार आहे. त्यातून खूपकाही साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रकल्पाची किंमत ५५ हजार कोटींची होती. आता ती ६१ हजारांवर गेली आहे. १० थेट आणि १४ अप्रत्यक्षपणे जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे”,असंही अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या प्रकल्पासाठी १२ कोटी सिमेंटच्या बॅग्स या महामार्गाला लागल्या आहेत. सात लाख मेट्रिक टन स्टिल, १३ कोटी घनमीटर भराव केला आहे. आठ कोटी घनमीटर खोदकाम केलंय. खोदकामानंतर आलेल्या मलब्यातून ६ कोटीचा मालाचा पुनर्वापर केला गेला. खोदकामातील मलब्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, याचा दृष्टीकोन रस्ते विकास मंडळाच्या टीमने आणि सार्वजनिक विभागाने ठेवला आहे. असं मोठं काम राज्याकरता झालं आहे, यांच मोठं समाधान आहे”, असंही अजित पवार म्हणाले.