जालना : गुरांच्या व्यापाऱ्याची दोन वाहने पेटवून देणे, त्याचप्रमाणे खंडणी मागितल्याच्या संदर्भात भोकरदन तालुक्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सिल्लोड येथील व्यापारी बिपीन पाटील यांनी यासंदर्भात दोन स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. खरेदी केलेली गुरे विक्रीसाठी नेत असताना भोकरदन येथे आपणास अडवून काही जणांनी साठ हजार रुपयांची मागणी केली.
गुरे खरेदीच्या कायदेशीर पावत्या दाखवूनही अडवणूक केली, असे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी श्रीकृष्ण पांडुरंग लहाने, अजय साहेबराव सपकाळ, विजय साहेबराव सपकाळ, कृष्णा सुभाष, अनिल विष्णु गायकवाड आणि श्याम काशिनाथ शिंदे (रा. सर्व भोकरदन) यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
तर भोकरदन तालुक्यातील पळसखेडा दाभाडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर निधील पाटील यांची गुरे वाहून नेणारी दोन वाहने पेटवून देणे आणि मारहाण करण्याच्या प्रकरणात हसबाबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी विजय साहेबराव सपकाळ, अजय साहेबराव सपकाळ, किरण सुभाष गंगातिरे (रा. भोकरदन), दिनेश मन्साराम खंडागळे (रा. गोकुळ ता. भोकरदन) आणि बाबासाहेब खरात (रा. पळसखेडा) व इतर दहा-पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.