BJP vs Uddhav Thackeray : पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपापासून फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तेव्हापासून भाजपा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात आक्रमक झाली आहे. पुढे भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत २०१९ चा बदला घेतला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) सतत एकमेकांवर टीका आणि आरोप-प्रत्यारोप करत असतात. अशात आता, भाजपाने १९९३ च्या दंगलीवरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर सामना वृत्तपत्राचा लोगो असलेला एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांनी १९९३ च्या दंगलीबाबत कोणतीही माफी मागितले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, “१९९३ च्या दंगलीसाठी मी माफी मागितली, असे खोटे पसरवण्यात आले आहे. माफी उद्धव ठाकरेंनी नव्हती, मागितली ती अटल बिहारी वाजपेयी यांनी मागितली होती. Babari WAS A Terrible Mistake हे उद्धव ठाकरे नाही तर, लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते. नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेंनी नाही तर, तुमच्या नरेंद्र मोदींनी खाल्ला होता. लहानपणी आमच्या शेजारी मुसलमान कुटुंब राहायची, ईदच्या दिवशी आमच्या घरी त्यांच्याकडून जेवण यायचे आणि मी त्यांच्या ताजे खालून जायचो, हे उद्धव ठाकरे नाही तर, नरेंद्र मोदी बोलले होते. मोहन भागवत मशिदीत गेले होते, उद्धव ठाकरे गेलेले नाहीत.”

मुंबई मध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला…

उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण समोर आल्यानंतर आता भाजपाने, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा फोटो शेअर करत त्यांना टोला लगावला आहे. भाजपाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जनाब उद्धव ठाकरे विशिष्ट समाजाच्या मतांसाठी तुम्ही तुष्टिकरणाची जी रीळ ओडली आहे, ते महाराष्ट्र ते विसरला नाही. वक्फ बोर्डाच्या समर्थनार्थ तुम्ही काँग्रेसच्याही एक पाऊल पुढे होता. राम मंदिराला विरोध म्हणून तुम्ही प्राणप्रतिष्ठेला अयोध्येत गेले नाही. तसेच छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण करणाऱ्या पिलावळीच्या रक्षणार्थ तुम्हीच पुढे आला होता. मतांसाठी मुंबई मध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला बरोबर घेऊन तुम्ही केलेला प्रचार मुंबईकर आणि उलेमा बोर्डच्या १७ समाजविघातक मागण्यांना दिलेला पाठिंबा महाराष्ट्र विसरला नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “यादी मोठी आहे जनाब…माफी मागितली नव्हती तर त्याचा खुलासा तेव्हाच केला असता आता नाही. जो बूंद से गई वह हौद से नहीं आती.”