सोलापूर: यंदाच्या उन्हाळ्यात कमालीच्या तापलेल्या सोलापुरात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरण आणखी बदलले आहे. बुधवारी तापमानात लक्षणीय घट होऊन ३३.३ अंश सेल्सिअस तापमान मोजण्यात आले. काल बुधवारी सायंकाळी सुरू झालेला अवकाळी पाऊस रात्री उशिरापर्यंत कोसळत होता. शहर व परिसरात रात्री ३८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात जवळपास सर्व भागात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.

यंदाच्या उन्हाळ्यात सोलापुरात ४० अंशाच्या पुढेच तापमानाचा पारा चढला होता. २ मे रोजी तर तापमान ४५ अंशांच्या घरात पोहोचले होते. मात्र त्यानंतर सुदैवाने वातावरणात बदल होऊन तापमान हळूहळू घटत चालले आहे. मात्र तापमान घटत असले तरी उकाडा कायम राहिल्याने सोलापूरकरांना अवकाळी पावसाची आस लागली होती. सुदैवाने ही आस पूर्ण होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केल्याचे दिसून येते.शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय बनले होते. काही रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली होती. सखल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने तेथील भूमिगत गटारे तुंबली होती.

ग्रामीण भागात उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यासह अक्कलकोट, मोहोळ, माढा, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, करमाळा आदी बहुतांश भागात दमदार अवकाळी पाऊस कोसळला. सांगोला शहर व तालुक्यात पावसामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अक्कलकोटमध्ये सायंकाळी वादळी वारे, ढगांचा गडकडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. करमाळ्यात रात्री उशिरा अवकाळी पाऊस झाला. कुर्डुवाडी, माढा, मोडनिंब, टेंभुर्णी आदी ठिकाणी धुवाधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे.

उजनी धरणात पाऊस

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा अवघ्या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर खालावला असताना याच धरणाच्या परिसरात २८ मिलिमीटर अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. धरणात सध्या वजा २२.९६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात एकूण वजा ५१.३६ टीएमसी पाणीसाठा आहे. आतापर्यंत वजा १२.३० टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा तालुक्यांत टँकरने पाणी

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत टंचाईग्रस्त २६ गावे आणि जवळपास तेवढ्याच वाड्यांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागात जनतेची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मागणीचे आणखी प्रस्ताव आल्यास त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे स्थळ पाहणी करावी आणि पाणीटंचाई दूर करण्यासाठी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत.